(‘मुलाचं वडिलांना पत्र’ हे पत्र वडिलांनी वाचलं आणि आता वडील मुलाला त्याच्या पत्राचे उत्तर देतात अशी कल्पना करून मुलांनी वडिलांच्या भूमिकेतून त्यांच पत्र लिहिल)
वडिलांच पत्र

हम्म, वाचलं तुझं पत्र. त्या पत्रातून एक गोष्ट लक्षात आली तुझ्या शिक्षणावर केलेला खर्च अर्ध्याहुन जास्त वाया गेला. दोन गुण चांगले पडतील असं काहीतरी शिकण्याची गरज असलेले तुम्ही, हे सगळं पत्र व्यवहार काय करताय. पत्राची सुरवात केलीस तेही मायना न लिहिता. कोणत्या मास्तराची कल्पना होती त्याचं नाव आणि पत्ता सांग कारण जसं अब्राहम लिंकन हेडमास्तरास पत्र लिहिलं तसं मलाही त्यांना पत्र लिहायला पाहिजे. ज्या माणसांना फक्त मार्क्सच्या मागे विद्यार्थ्यांना लावण्यापेक्षा नाती फुलवणारी कल्पना केली, त्यांना धन्यवाद तरी द्यायलाच पाहिजे.
तू महाविद्यालयात जातोस हे पाहून तुला किमान अक्कल आली असेल, असा गोड गैरसमज मला काही दिवसांपूर्वी झाला होता. तो या पत्राने बराच कमी करुन टाकला. अरे तुला कसं नाही कळलं हे पत्र काल्पनिक आहे माझ्यापर्यंत येणार नाही फार फार तर वर्गातल्या मास्तर वाचेल. बापाची इज्जत काढायच्या आधी एवढा साधा विचार कसा नाही तुला तुझ्या डोक्यात आला. पण जाऊ देत सगळ्यांनीच काढली असणार त्यांच्या त्यांच्या बापांची अब्रू त्याला तू तरी अपवाद कसा असणार.
तर तुला पाच गर्लफ्रेंड आहेत की सहा हे मला माहित नाही असा जो तुझा गैरसमज आहे ना बाळा तो माझ्या उत्तम अभिनयाचा पुरावा आहे. गाडी सर्विसिंगला नेऊन जिला घेऊन हॉटेलात गेलास ते हॉटेल माझ्या ऑफिसमध्ये कामाला असणाऱ्या जोशींच्या मेव्हण्याच आहे. त्याची आणि तुझी ओळख नसली तरी त्याची आणि माझी चांगली ओळख आहे आणि तो तुला माझ्या बाईक वरून ओळखणार नाही असेही नाही. बापाला काही समजत नाही त्यांना टेक्नॉलॉजीचं कुठे काय कळतं असा जो तुमच्या एकंदरीत पिढीचा समज आहे. त्याला तू तरी काय करणार बाळा. आई बापाला टेक्नॉलॉजी फार कळत नाही हे खर आहे. पण कोण, कुठे, कधी आम्हाला फसवते, खोटं बोलते हे मात्र चांगलं समजत. उगीच नाही बाप झालोत. दोन-चार तांत्रिक चाळे करून जे स्मार्टपणा दाखवताय त्यातला पोकळपणा तुम्हाला दिसत नसेल कदाचित पण आमच्या नजरेत ढळढळीत दिसतो.
1. राजकारणावर चालणाऱ्या चर्चा बद्दल
हे बघ गॉसिप्स आणि डिस्कशन (गप्पा मधला आणि चर्चेतला यातला) फरक कळत नाही असं नाही पण ज्या पिढीतून आम्ही आलोय त्यात मनोरंजनाचा एक भाग गप्पा राहिलाय. आणि काय रे मला जरा सांग तुमची व्हाट्सअप आणि फेसबुकचे अकाउंट बघितलेत तर काय मिळेल गॉसिप्स की डिस्कशन. पण चर्चाही धोरणकेंद्रित असावी ही बाब लक्षात ठेवीन, किमान प्रयत्न करीन. आम्हाला चर्चेची दिशा सांगून स्वतःच दिशाहीन होणार नाही याची जाणीव तेवढी राहू द्या.
2. कोण काय म्हणेल?

कोण काय म्हणत याचा नेहमी वाईट अर्थ काढायचा नसतो. त्यातून सर्वसामान्यपणे चुकीच्या कृतीच्या निषेध किंवा विरोध करून चांगल्या गोष्टींची भलामन करायची असते. कुठलीही व्यवस्था कधीच पूर्ण नसते त्यात कमतरता असतात, चुका असतात. आपल्याला कोण काय म्हणतो ते महत्त्वाचं नसतं, त्यातून आपण काय अर्थ काढणार आहोत ते महत्त्वाचं असतं. जर तू स्वतःबद्दलच नकारात्मक असशील तर त्या गोष्टीचा अर्थ देखील नकारात्मकच काढशील, पण जर तू रचनात्मक असशील तर मारलेल्या टोमण्यात देखील तू स्वतःसाठी उपयोगाच्या गोष्टी बरोबर टिपशील. त्यामुळे मी कुणाला काय म्हणतो किंवा कोणी आपल्याला काय म्हणत हे महत्त्वाचं नाही. आपला त्यावरचा प्रतिसाद महत्त्वाचा असतो.
3. पैश्यांबाबत
पैशाच्या बाबतीत तुझा सल्ला या काल्पनिक पत्रात लिहायची गरज नव्हती. या पत्रात आपल्याला त्याच गोष्टी लिहायच्या आहेत ज्या समोरासमोरंपासून आपण बोलत नाहीत. शेअर मार्केट हा मुद्दा आता जवळपास बऱ्याच घरात बापलेक चर्चेला घेत असतात पण आपण शेअर मार्केटच्या घवघवीत रिटर्न्सपेक्षा आम्ही एफडीवर कमी पैसे का मिळवले याचा कारण सांगतो. त्यातून मिळवलेला पैसा प्रामुख्याने तुमच्या भविष्यासाठी खर्च करायचा होता. शेअर मार्केटमधील जोखिम मला कुठल्याही परिस्थितीत तुमच्या भविष्याशी जोडायची नव्हती. ट्राइड अँड टेस्टेट मार्ग वापरणारे कंटाळवाणे असतात की मुलांच्या भविष्याबद्दल संवेदशील असतात की घाबरट असतात ते तुम्ही ठरवा (बाप झाल्यावर व्यवस्थित कळेलच म्हणा).
4. कपड्यांची स्टाईल

पैशांच्या बाबतीत तू मला समोरच बोलला असतास तरी चालल असत पण कपड्याच्या बाबतीत मात्र काल्पनिक पत्रात देखील बोलू नकोस. तूच म्हणून नाही पण तुमची पिढीच बापाच्या पिढीला किमान कपड्यांबद्दल तरी शिकवु नका. गुडघ्यावर फाटलेला पॅन्ट विकत घेणारे तुम्ही, फाटलेले कपडे टाकून देणाऱ्या आमच्या पिढीला अजिबात सांगू नका की फॅशन कशी करायची असते. तुम्ही लागू द्या तुमच्या गुडघ्यात असलेल्या मेंदूला थोडीशी हवा त्या गुडघ्यावरच्या फाटक्या पॅण्ट मधून. आणि तू ओळखणार रे आम्हाला कपड्यावरून, कोण वकील नी कोण मास्तर ते. अरे गधड्या रस्त्यावरच्या भिकाऱ्यांत आणि त्या फाटक्या कपड्यातल्या तुझ्या मित्रांमध्ये नेमकं कोण जास्त दारिद्रित आहे याचा अंदाज लावणं मुश्किल आहे. ते विचारे भिकारी आर्थिक दारिद्र्यात आणि तुम्ही लेकहो वैचारिक दारिद्र्यात एवढाच काय तो फरक.
5. बदल स्वीकारण्याबाबत
निश्चितच जे बदल आपल्यापुढे आहेत ते वापरायला आणि स्वीकाराला सोपे आहेत. प्रश्न तो नाही, प्रश्न हा आहे की नेमका असा जेव्हा एखादा बदल समोर येतो त्याचबरोबर इतर नवीन धोके, फसवेगिरीचे या आधी कधीही न पाहिलेले स्वरूप येत असते. नवीन तांत्रिक बदल स्वीकारायचा म्हणजे ते सर्व फसवेगिरी करणाऱ्या मार्गांना वेळेत ओळखून स्वतःचा नुकसान होण्यापासून थांबवणे आलंच. फसवणारे सर्व मार्ग प्रथमदर्शनी अस्सल असल्याप्रमाणे वाटतात. नेमकं आपण कुठे फसवलं जाऊ शकतो याचा अंदाज घेऊन सावधपणे पाऊल टाकण्याचा प्रयत्न असतो. व्यवस्थित बघितल तर त्या सर्वांच्याच लक्षात येईल की जीवनभर कष्टाने उभी केलेली संपत्ती जी आमच्या म्हातारपणाचा आधार असते, एकंदर आमच्या जगण्या आधार असते ती एका सेकंदात गायब होऊ शकते. त्यामुळे बदल स्वीकारताना त्रासाऐवजी काळजीच लागलेली असते.
6. ताणतणावाच नियोजन
चुका स्वीकारणे, माफी मागणं या कमीपणाच्या किंवा लहानपणाच्या गोष्टी नाहीत, हे मान्य आहे मला. जिथे चूक होईल तिथे मान्य करावी, ती सुधारावी. लागलीच तर मदत ही मागावी. पण ती कोणा समोर आणि किती मागावी याच भान असणं महत्वाच आहे. नाहीतर माफी आणि माफी मागणारे या दोघांची किंमत उरत नाही. माफी मागायला आणि चुका कबूल करायला आमचा अहंकार आडवा येतो असा सरधोपटपणे अर्थ काढायचा नव्हता इथे.
बाळा मदत मागणं, माफी मागणं ह्या गोष्टी करणं जितकं महत्त्वाचं आहे त्याहूनही महत्त्वाचं आहे, ह्या गोष्टी कुठे करायच्या आणि कुठे टाळायच्या हे समजनं. उगीच ज्याच्या त्याच्या समोर हात जोडून माफी मागशील तर स्वतःच पायपुसण करून घेशील. मदत माग पण इतकीच की त्या मागण्यात आपला आब राखता आला पाहिजे.
7. काळसुसंगत बदलणारे संदर्भ

सर्वसामान्यपणे जर तुम्ही सगळ्यांनी तुमच्या वडिलांच्या पिढीकडे पाहिलं तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की आज तुम्हा मुलांना मिळालेल्या सोयी सुविधा तुमच्या पालकांना मिळालेल्या सोयी सुविधाच्या तुलनेत निश्चित जास्त आहेत. ते निम्म्याहून अधिक तर अशिक्षितांची मुलं, त्यातून पुढे आलेली. काय वाटतं रे तुला चुका मान्य न करता, त्यातून काहीही न शिकता, त्यांना न बदलता, चुकल्यावर माफी न मागता आणि लागलीच तर मदत न मागता इथवर पोहोचले असतील का?
चरित्राबद्दलची जी समज तुझी तीच माझी. त्याची व्याख्या ठरवणारा मी नाही, पण समाजाचा दबावात त्या व्याख्या मान्य करणारा असेन कदाचित. तुला त्या मान्य करायची गरज नाही, तितकी मोकळीक द्यायला समाजाच लवचिक झाला आहे. फक्त काळजी वाटते ती याची की जी मोकळीक मिळाली ती रचनात्मक कार्यासाठी वापरावी अन्य कशालाही वापरु नये. नियम तोडणाऱ्यांनी एकमेव नियम लक्षात ठेवावा तो म्हणजे नियम तोडून अधिक योग्य नियम बनवावा. ह्यावर समोरासमोर बोलायच कसं हे जसं तुला समजत नाही तसंच मलाही कळत नाही की नेमकी संवादाची सुरुवात करायची कुठून.
8. समर्पक शेवट
यासारख्या अनेक विषयावर मागे पडलोय खरं पण काल्पनिक पत्रात देखील माझ्यावर इतर अनेकही चुका लपवल्यास तू. आपला बाप सर्वासमोर उघडा पडणार नाही याची घेतलेली काळजी दिसलीय मला. खरंतर यावर मलाच कधीतरी बोलायला हवं होतं त्याची सुरुवात कशी करायची हेच कळलं नाही. आधी तू लहान होतास, आता मोठा झालास आणि ज्ञानाचा कक्षेत तर मीच तुझ्या कधी मागे पडलो हे मलाही कळलं नाही. आज हे पत्र वाचून तुम्ही सर्व खूप कमी वयातच वडिलांच्या पिढीपेक्षा सर्वार्थाने खूप पुढे निघून गेलात हे लक्षात आलं त्याचा निश्चितच आनंद होतोय. पुढे जा, खुप पुढे जा, जीवनात योग्य ती काळजी घ्या आणि अपेक्षित असलेले धोके कधीही दुर्लक्षित करू नका. आशीर्वाद.
ही निर्मिती तुमचे लक्ष का वेधून घेते?
नेहमीप्रमाणे, kutumbwarta.comच्या प्रत्येक ब्लॉगच्या शेवटी आम्ही असे उत्पादने सुचवतो, जी ब्लॉगच्या विषयाशी सुसंगत आहेत आणि तुमच्या जीवनाला अधिक समृद्ध बनवण्यास मदत करतात. या ब्लॉगसाठी आम्ही दोन प्रेरणादायी पुस्तकांची शिफारस करतो – “The Power of Now” हे Eckhart Tolle यांचे पुस्तक, जे वर्तमान क्षणाचा स्वीकार करून नातेसंबंध आणि विचारांची स्पष्टता वाढवण्यास मदत करते, आणि दुसरे पुस्तक “The Story of My Experiments with Truth” हे महात्मा गांधींचे आत्मचरित्र, जे आत्मपरीक्षण आणि सत्याचा शोध कसा घेता येतो याबद्दल शिकवते.
जर तुम्हाला समजून घ्यायचे असेल की ही पुस्तके तुमच्यासाठी का महत्त्वाची ठरू शकतात, तर आमच्या भागीदार साइट awareandbeware.com वर त्यांचे सविस्तर परीक्षण वाचा. या परीक्षणात वैशिष्ट्ये, फायदे आणि मर्यादा यांचा सखोल आढावा घेतला आहे, ज्यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत होईल. अधिक माहितीसाठी संपूर्ण समीक्षा वाचायला विसरू नका!

